३६ च्या आकड्याने काय घडले ? कुठे, कसे घडले ? बघून सर्वच अचंभित झाले !
उमरखेड { भारत रेघाटे }
होय ! 36 चा आकडा हा प्रचंड विरोध दर्शविणारा असतो ? ३६ आकडा हा विरूद्ध दिशेला तोंड करण्यास भाग पाडणारा ? तर कधी नाक मुरडत, एकमेकां समोरही कधीच येणार नाही अशा अविर्भावात वागणारा स्वभाव ! हाच तो ३६ चा आकडा. किंबहुना अचानक चुकून आमने-सामने आलोच तर क्षणार्धात नजर दुसरीकडे बळेच वळवून ,पाऊलेही वळवायला सांगणारा ३६ चा आकडा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवन प्रवासात, प्रसंगानुरूप येत असतो. मात्र एका ठिकाणी या आकड्या बाबत अगळीक असेच काहीसे घडले. जणू त्यानेच अचंभित असे काही घडवून आणले. तो प्रसंगही ठरला ३६ वर्षानंतरच्या जीवन प्रवासातील अगदी विस्मयकारकच.

या 36 च्या आकड्याने एक आगळी वेगळी अनुभूती देत सर्वांनाच सुखद धक्का देणारा, अचंबित करणारा प्रसंग घडवून आणला. काय घडले ? कसे घडले ? कुठे घडले ? या ३६ च्या आकड्यामुळेच ? तो घटनाक्रम बघूनच सर्वच अचंबित झाले ! अन त्याने आपली किमया दाखवायला सुरूवात केली. निमित्त होते ३६ वर्षांच्या मैत्र जिवाच्या स्नेह मिलनाचे, लहानपणीच्या भावबंधाचे, काही विस्मृतीत गेलेल्या आठवणीचे.

१९८५ ते १९८९ ला एका शाळेत एकाच वर्गात शिकलेले वर्ग मित्र, मैत्रिणी होते ते. आजही अचानक कुठे तरी चुकून रस्त्यात भेट झालीच तर तो हाच का ? ती हीच आहे का ? याची पुसटशीही कल्पना येणार नाही. अशा या मित्र मैत्रिणींच्या जीवनात घडून गेलेल्या ३६ वर्षांच्या कालावधीचा प्रवास. यात झालेला आमुलाग्र बदल. तो स्वीकारून सर्व मित्र मैत्रिणी मात्र एकमेकाची भेट घेण्या जमले. त्यांनी एकमेकांना जाणले. एका अशा ठिकाणी जिथे ते घडले तिथेच.

या ३६ च्या आकड्यानेच स्नेहबंधाची, स्नेहमिलनाची सांगड घालण्याचे काम सोशल मीडियाच्या एका संदेशातून, संपर्काने, घडूवून आणला योग. तो संदेश दिला त्यांचेच वर्गमित्र संदेश देशमुख, वंदना मामीडवार, अंजली संस्थानिक, जयेश पानसुरिया, लक्ष्मण नांदे, सुजाता नांदगांवकर आदिंनी. जणू हा प्रसंग म्हणजे लक्ष्मणाच्या हातातील अंजलीने भरलेल्या फुलांना वंदन करावे अशा या मौलिक क्षणाच्या कीर्तीचा जय करावा असा हा परमानंद देणारा ३६ वर्षाचा अलौकिक क्षण !
अगदी कमी कालावधीत ३६ वर्षांपूर्वीचे वर्गमित्र, तर कोणी बालमित्र अशा सर्वांना एकत्रित करण्याचा मनोदय तब्बल ३६ वर्षांनी फळाला आला. संदेश देशमुख आता डॉक्टर झाला. लक्ष ठेवणारा लक्ष्मण नांदे मुख्याध्यापक झाला. अंजली संस्थानिक वंदना मामीडवार अधिवक्ता झाली. शिल्पा चिन्नावार डॉ तर वर्षा उत्तम गृहिणी, माणसात देव शोधणारा डॉ. नामदेव पतंगे, साहेबराव जाधव यांनी केलेले प्रयत्न, संपर्क, सोशल मीडियातून हे साध्यही करून दाखवले. अन पार पडला ३६ वर्षांपूर्वी लाभलेला सहवास आणि प्रवास मैत्रीच्या ऋणानुबंधाचा.

दहावी नंतर कोणीच कोणाच्या संपर्कात नसल्याने परंतु मैत्र जिवांचे असलेल्या या मित्र मैत्रिणींच्या स्नेह संवाद -मिलनाचे क्षण, प्रेम, सौहार्दाचे आणि भेटीगाठीच्या अनुबंधाची जणू ही एक उकलच ठरली. निमित्त होते मित्रांच्या स्नेह भेटीचे ! गेट टू गेदरचे.

१९८५, ८६, 87, 88, 89 या पाच वर्षात सर्व मित्र स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी साकळे विद्यालयात घडले. परंतु भविष्यात आपल्याच मित्रांना कधी, कुठे, कसे, भेटणार ? याची पुसटशी कल्पनाही यापैकी कोणालाच नव्हती. दहावी झाल्यानंतर प्रत्येकाने आपापले मार्ग निवडत मार्गक्रमण करत ही सर्व मित्र विस्थापित झाली. ती भविष्याच्या वाटेसाठी. ३६ वर्षानंतर त्यांचे व्यक्तित्त्व प्रस्थापित झाले हे ही तितकेच खरे ! मात्र कुठेतरी जाणीव, नेणीव, उणीव भासली. अन आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींना एकत्र आणण्याचा शोध सुरू झाला.
शालेय यादी मिळवण्यापासून मित्र- मैत्रिणीचे संपर्क, पत्ते, घर ,गाव, सासर अशा अनेक गोष्टींचा मागोवा घेत तब्बल ३६ वर्षानंतर १०० हून जास्त असलेल्या ६० मित्रांना एकत्रित करण्यासह स्नेहबंधात गुंफण्याचे काम याच वर्ग मित्रांनी केले. विद्येची देवता शारदा, विद्या महर्षी, विदुषी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून अमृतवेल अशा या सोहळ्याचा कार्यारंभ करण्यात आला.

ज्या ठिकाणी घडलो, शिकलो. त्याच ठिकाणी ३६ वर्षानंतर ही सर्व मित्र एकत्र आली. काय ती धम्माल ! गाणी, मौज ,मजा, डान्स, संवाद फेक, गोळ्या बिस्कुटांची गाडी, शालेय प्रांगणातील फेरफटका, गोट्या खेळण्याचा क्षणैक आनंद, मनाचे हिंदोळे लुटत परमानंद देणारा क्षण. एकमेका बद्दल आदरपूर्वक विचारपूस करत. काय करतो, कुठे असतोस, कसा आहेस, कशी आहेस ? वैगरै, वैगरे बद्दल एक भावनिक साद घालत. या कार्यक्रमाला मूर्त रूप देण्याचे काम या स्नेह मिलनातून घडवले. ते स्नेहमिलन ठरले वर्गमित्र मैत्रिणीच्या आनंद सोहळ्याचे.
या कार्यक्रमाला भरीव अशी साथ मिळाली वर्ग शिक्षक भारत कुलकर्णी, भैय्यासाहेब चौधरी, प्रसाद पेंटेवाड,ए. के. पांडे, आणि वर्ग मित्र मैत्रिणींची.
आपले विद्यार्थी एका चांगल्या पदावर ,चांगल्या क्षेत्रात स्वतःचे नाव कमवत आहेत. हे बघून गुरूंनाही गहिवरून आले. हा गुरू शिष्य भेटीचा सोहळा म्हणजेच जणू गुरू दक्षिणा तर नव्हती ना ! हा भाव शिक्षकवृंदांच्या चेह-यावर स्पष्ट दिसून आला.
काहीं मित्रांनी दहावी झाल्यानंतर घरची शेती, व्यवसाय निवडला . अनेकांनी दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेतले. काहींनी व्यवसाय सुरू केला. तर काहींनी शेती केली, कोणी डॉक्टर तर कोणी वकील, कोणी इंजिनियर, तर कोणी पत्रकार, कवी, साहित्यिक, निवेदक, कोणी सरकारी नोकरदार, कोणी खासगी क्षेत्रात उद्यमी, तर शिक्षित असूनही कुटुंब वत्सल छान गृहिणी म्हणून आपला जम बसवून आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला.

या स्नेहमिलनात ३६ वर्षानंतर जुन्या सुख नि दुःखाच्या आठवणीसह विद्यार्थी रमले. अनेक जण शिक्षित, उच्चशिक्षित असून आपापल्या इच्छा आकांक्षाना वाट मोकळी करुन देत आपल्या बोलक्या भावनांना अबोल करत हलके स्मित करत या सोहळ्यात हरकून गेले. भूतकाळातील हरवलेले क्षण हे परत कधीच येत नाही म्हणूनच एक क्षण सगळ्यांना अचंबित करणारे वाटत असतात. आपल्यासाठी आपल्या खास मित्रांसाठी हा आठवणीचा अनमोल ठेवा सदैव स्मरणात राहील.

मधल्या काळात आपले वर्ग शिक्षक सेवा निवृत्त झाले अशा ऋषितुल्य गुरुजनांना बघून त्मांचा सहभाग बघून मनोमन आनंद झाला. चरणस्पर्श करताच पन्नाशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी पाठीवर पडलेला शाबासकीचा आशीर्वादही यावेळी घेतला.
दरम्यान काही मित्र आम्हाला आणि या जगाला सोडून गेले कै. गोविंद नांदे, सुनील लाहोरे, सुदर्शन टेकाळे, प्रशांत भोकरे, संदीप चव्हाण यासह मुख्याध्यापक कै. अनंत पोटे, अरुंधती पोटे, तु .रा. दादेगावकर, श्रीमती दादेगावकर, बंडोपंत भंडारे, रा. तू. आलट, गांधी, आयाचित, आबा जयस्वाल, कै निलपवार सर, सेवा देणारे सेवक कै बाळू काका, विलास, कोडबा, दत्ता आदि प्रती असलेली आदरयुक्त भीती आजही आठवते. त्यांच्या प्रेरणादायी आठवणीचे स्मरण करत गुरूवर्य आणि मित्रांना यावेळी सुमनाने श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

ज्या वर्गात शिकलो घडलो. त्या वर्गाला वस्तुरूपी आठवणीची भेट म्हणून मित्र वर्गणीतून काही वर्गाना पंखे बसविण्यात आले. असा हा छान खेळीमेळीचा आनंद व्दिगुणित करणारा निरोप समारंभ सोहळा पार पडला. खरंतर हा निरोप नव्हताच. तो होता रोप लावणा-या नावीण्याचा. म्हणूनच अशा या आठवणीच्या निरोपा बरोबरच निसर्गाचे देणं लागतो. या उद्दात्त भावनेने प्रेरीत होत . शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करत नवतेचा शुभारंभ करण्याचे काम या वर्ग मित्रांनी केले.

स्नेहमेळाव्यातील अशी ही आपुलकीची विचारपूस. प्रत्येक जण आत्मियतेने, जिव्हाळ्याने, एकमेकाची भेट घेत विचारपूस करतांना दिसून आले. आणि मग सुरू झाला प्रवास एकमेकाशी संपर्क करण्याचा. संवादाच्या माध्यमातून. संदेशाच्या माध्यमातून. आज ही ऋणानुबंधाच्या मैत्रीची वेल अधिक घट्ट करून. ती अ गटातील असेल का ? तू ब गटात होतास का ? असं म्हणत असतानाच आज हे सगळे गट तट बाजूला सारून, केवळ एक सुसंवादाचा गटच नव्हे तर विचाराचा समूह तयार करण्याचे काम या वर्ग मित्रांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारले. अशी ताटातूट पुन्हा कधीच न होण्यासाठीच !

खरंतर साकळे विद्यालय हे खूप जुने स्वातंत्र्य पूर्व काळातील विद्यालय आहे . खास आपल्या मित्रांसोबत अन् गुरूच्या भेटीसाठी आतूर झालेली एक आगळी वेगळी मेजवानीच होती हा कार्यक्रम. स्नेहा बरोबरच रसास्वादाचा. अन् जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने जागृत करत. जणू होता तो "प्रारंभ मैत्र जिवांचा". या आठवणींना सुसूत्रात गोवण्याचा परिपूर्ण प्रयत्न या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आला.

नानासाहेब साकळे, कृ. रा. देशपांडे यांचा मोलाचा वाटा। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील साकळे विद्यालयाच्या उभारणीत नानासाहेब साकळे, कृ. रा. देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. १९१४ ला या विद्यालयाची स्थापना झाली . कृ. रा. देशपांडे यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता. त्या काळात शैक्षणिक कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलत योगदान दिले. नानासाहेब साकळे यांनी १९१८ ला दिग्रस वरून कृ. रा. देशपांडे यांना या शाळेवर रुजू केले. अँग्लो व्हर्नाकुलर एज्युकेशन सोसायटीचे साकळे विद्यालय या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब साकळे होते.

लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरीत होवून ते सिध्द करण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी इंग्रजी शाळेला झुगारून मराठी शाळेला प्रेरित करण्याचे काम केले. १९५० ला इंडेड स्कूलची स्थापना त्यांनी केली. पुढे या शाळेचे नामकरण "साकळे" विद्यालय असे करण्यात आले. मुख्याध्यापक अनंत पोटे, भारत कुलकर्णी, अरविंद पांडे, अंबादास साकळे, स. ल. कदम, तु. रा. दादेगावकर, श्रीमती दादेगावकर, श्रीमती पोटे, नारायण निलपवार, मामीडवार, म. या. गांधी, बंडोपंत भंडारे, भैय्यासाहेब चौधरी, श्री बर्डे , श्री हनुमंते, श्री बिच्चेवार आदि गुरूंच्या मौलिक मार्गदर्शनाने आम्ही घडल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मीना जवादे, अंजली संस्थानिक, सुधा भोयर, अलका राठोड, वर्षा लोहारे, सूजाता नांदगावकर, शिल्पा चिन्नावार, कीर्ती देशपांडे, मालती देशमुख , नजमा पठाण, अलका राठोड, संगीता चव्हाण, आशा मामीडवार, लीना लासीनकर, कविता हाके, लक्ष्मी आगलावे, मंजू पटेल, बालरोग तज्ज्ञ डॉ. संदेश देशमुख, अनिल राठोड, उद्योजक जयेश पानसुरिया, विश्वास खोत, मुख्याध्यापक लक्ष्मण नांदे डॉ. नामदेव पतंगे, गजानन लांडगे, साहेबराव जाधव, प्रगतशील शेतकरी वीरभद्र पत्रे, लहुजी गायकवाड, सुदर्शन झाडे, उमेश निलपवार, बापूराव वाठोरे, अविनाश भोकरे, काशिनाथ हिवरे, दयानंद काळबांडे, जगदीश शर्मा, गणेश काण्णव, प्रकाश उल्लंगवार, किसन धुळे, सर्जेराव भोयर, उत्तम व्यवसायी शेतकरी ज्ञानेश्वर सरकटे आदि मित्रगणांंनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मौलिक योगदान दिले ते अविस्मरणीय क्षणासाठीच !
