आमदार खताळ यांनी आषाढवारीचे महत्त्व केले अधोरेखित ; अबू आझमींवर सोडले टीकास्त्र, म्हणाले आझमी तुझी लायकी नाही- आ खताळ
संगमनेर { भारत रेघाटे }
शिवरायांचे रक्त आमच्या धमण्यातून सळसळ वाहत आहे. तुला जर त्रास होत असेल तर तू तुझी बॅग भर, तिकीट काढ अन आला तसा परत जा ! आषाढी वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. अबू आझमी तुझी वारीवर बोलण्याची लायकी नाही अशा खर्ड्या शब्दांत शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीने वारी संदर्भात केलेल्या विधानावर खरपूस समाचार घेत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आषाढीची वारी आणि नमाजाच्या गर्दीची तुलना करताना समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी यांनी वारीतील पालख्यांमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य केले. यावर चांगलच वादंग निर्माण झाला आहे. संगमनेरचे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया देताना आमदार खताळ म्हणाले की , "अबू आझमी नीट लक्षात ठेव, वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे.पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन वारा, पावसाच्या सरी झेलत, पायी चालत असतात. विठ्ठलाच्या पायी नतमस्तक होतात. ट्रॅफिक जॅम सोड, ॲम्ब्युलन्स जरी आली तरी लाखो वारकरी एका मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सला जायला वाट मोकळी करून देतात. ही आमची संस्कारांची आणि अध्यात्माची परंपरा आहे.

आझमी तुला त्रास होतोय तर मग तुझी बॅग भर, तिकीट काढ आणि आल्या पावली परत जा..बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या तुमच्या सारख्या भैय्याना ‘वारी’ वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि लक्षात ठेव, आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सहनशील आहे, पण शिवरायांचं रक्तही आमच्यात सळसळत आहे, हे विसरू नकोस!" अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी अबू आझमी याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

_नेमकं काय म्हणाले अबू आझमी ?_
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात ? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
