शिवसेनेचा झंझावात चिरनिद्रेत ; ज्येष्ठ शिवसैनिक कैलास केसेकर कालवश
संगमनेर ( प्रतिनिधी )
ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हा उपप्रमुख कैलास उर्फ आप्पा मुरलीधर केसेकर (वय ६१ ) यांचे शुक्रवार दि. २३ रोजी अल्पशा आजाराने पुण्यातील एका खासगी रूग्णालयात रात्री १० वाजता निधन झाले. चंपाषष्ठी २६ नोव्हेबरला अचानक छाती दुखू लागल्याने संगमनेर येथे खासगी रुग्णालयात त्यांना भर्ती करण्यात आले. काही दिवस उपचारानंतर त्यांना पुण्यातील एक नामांकित रूग्णालयात भर्ती करण्यात आले. दोन महिन्यांच्या सशर्त प्रयत्नानंतर अखेर शुक्रवारी रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संगमनेर तालुक्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज हरपला असून निष्ठा, संघर्ष आणि निर्भीडपणाचा एक तेजस्वी अध्याय संपला आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकेचे पहिले शिवसेनेचे नगरसेवक म्हणून त्यांनी इतिहास घडवला. शिवसेनेचा धगधगता काळ पाहिलेला आणि प्रत्यक्ष जगलेला हा कडवट, लढवय्या एकनिष्ठ शिवसैनिक संघटनात्मक बांधणीत कणा ठरला. आपल्या प्रभागात शिवसेनेचा भगवा ध्वज टिकून ठेवण्यासाठी त्यांचा सिंहांचा वाटा होता. शिवसैनिकांचे ते आधारस्तंभ होते. समाजकार्या सोबतच धार्मिक कार्यातही ते नेहमी अग्रभागी असत. संकटसमयी धावून जाणारा, मनाने राजा असलेला माणूस म्हणून आप्पा सर्वपरिचित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ प्रेम आणि त्यांचे विचार जीवनात खंबीरपणे अंगीकार करणारे, निर्भीड व ठाम मताचे व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वश्रुत होते. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणारा लढवय्या कार्यकर्ता म्हणून कैलासशेठ केसेकर हे केवळ नेते नव्हते, तर प्रत्येक शिवसैनिकाचे आपुलकीचे “आप्पा” होते. घोटातला घोट, घासातील घास देणारा एक प्रेमळ माणूस. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. पक्षांतर्गत दुफळीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द अपेक्षित उंची गाठू शकली नसली, तरी त्यांनी नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक दिग्गज व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केली.
आप्पाच्या जाण्याने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही हे तितकेच खरे. वडील मुरलीधर ( नाना) हे व्यावसायिक होते. नाना नानी यांना बारा अपत्ये त्यापैकी पाच क्रमांकाचे धाडसी अपत्य आप्पा. यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, भाऊ, पुणणे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. २४ रोजी दुपारी ४ वाजता साळीवाडा येथील 'नाना ताई' निवास स्थानापासून निघणार असून संगमनेर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अगणिक अशा शिवसैनिकांच्या हृदयात आप्पांची आठवण कायम जिवंत राहील.

