आशा, विश्वास आणि विकासाचे नवे पर्व २०२६ चे नवीन वर्ष – आमदार खताळ
( तालुकावासियांना आमदार अमोल खताळ यांचा प्रभावी नववर्ष संदेश )
संगमनेर (प्रतिनिधी)
नवीन वर्ष २०२६ हे संगमनेर तालुक्यातील प्रत्येक घरात सुख, समाधान, शांतता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येकाच्या जीवनात नव्या संधींची दारे खुली होवोत, परिश्रमांना यश लाभो आणि सामूहिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू व्हावा, अशा मनापासून शुभेच्छा आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील सर्व जनतेला दिल्या. नववर्षाच्या शुभेच्छा देताना आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरच्या जनतेने दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी केवळ राजकीय पाठिंबा नसून, लोकसेवेची मोठी जबाबदारी आहे. हा विश्वास कायम ठेवत विकास, न्याय आणि समतेच्या मार्गावर अधिक ठामपणे वाटचाल करण्याचा माझा निर्धार आहे. ते पुढे म्हणाले की, नवीन वर्षात संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख ध्येय राहील. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, शेतीपूरक सुविधा, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, दर्जेदार शिक्षण, सक्षम आरोग्यसेवा आणि भक्कम पायाभूत सुविधा यासाठी अधिक गतीने, पारदर्शक आणि परिणामकारक काम केले जाईल. संगमनेरचा प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. कोणताही घटक मागे राहू नये, प्रत्येकाला न्याय, सन्मान आणि सुरक्षितता मिळावी, यासाठी मी सदैव जनतेसोबत उभा राहीन. नवीन वर्षात प्रत्येक समाजघटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, हाच माझा खरा नववर्ष संकल्प आहे, अशा शुभेच्छा आमदार खताळ यांनी दिल्या.
