वीरगावच्या विहिरीत दोन बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; एवढी लहान मुले विहीरीत पडलेच कसे ? वीरगावात संभ्रम
अकोले ( प्रतिनिधी )
वीर गावात सोमवार (दि. १५) रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावातील एका शेतातील विहिरीत कोवळ्या वयाची दोन बालक पडल्याची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत दोन्ही बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे दोन बालक विहिरीत आढळलीच कसे असा संभ्रम वीरगावात निर्माण झाला आहे.
मृत बालकांमध्ये पियुष पोपट मेंगाळ (वय ८ महिने) व श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच रात्रीच पियुष यास विहिरीतून बाहेर काढण्यात आले, तर श्रेयाचा मृतदेह मंगळवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
या घटनेनंतर वीरगावात सर्वत्र शोककळा पसरली असून दोन्ही बालकांवर वीरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे, या बालकांचे वडील पोपट मेंगाळ ( निळवंडे ) यांचा सात आठ महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर या मुलांची आई आशा मधे वीरगाव येथे आपल्या माहेरी राहण्यासाठी आली होती. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांची मनस्थिती सावरण्यासारखी नव्हती.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस विनोद खांडबेहरे पुढील तपास करीत आहेत. अकोले शहर पोलिसात सदर घटनेची अकस्मात नोंद करण्यात आली असून पुढील तपासानंतर कारवाई करण्यात येईल असे अकोले पोलिसांनी सांगितले.

