कोयता हल्ल्यातील दोन फरारांना सांगलीतून उचलले ; संगमनेर न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी ; हल्यात पाच नाही तर चारच आरोपी निष्पन्न
संगमनेर ( प्रतिनिधी )
शहरातील इंदिरानगर परिसरात सोमवार दि २३ फेब्रुवारी रोजी गाजलेल्या कोयता हल्ला प्रकरणातील फरार दोन आरोपींना अखेर संगमनेर शहर पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथून अटक केली असून संगमनेर येथील न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी शहरातील मध्यवर्ती असलेल्या इंदिरानगर परिसरात जुन्या वादातून पाच जणांच्या टोळीने प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्या समोरील मैदानात रोहित वाळके यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी परिसरात नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मैदानात एकच गोंधळ उडाला आणि तेथे उपस्थित युवक सैरावैरा पळताना दिसले. या हल्ल्यात रोहित वाळके गंभीर जखमी झाला होता. या घटनेप्रकरणी रोहित वाळके यांच्या पत्नी ममता वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अथर्व रासने, ओम काथे, साहिल देवरे, सुमित शेवंते आणि शैलेश रोकडे या पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
23 फेब्रुवारी घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात अथर्व रासने व शैलेश रोकडे यांना ताब्यात घेतले होते, तर उर्वरित तीन आरोपी फरार झाले होते. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब सातपुते, विजय खुळे आणि राहुल पांडे यांच्या पथकाने तपास सुरू ठेवला. तपासा दरम्यान फरार आरोपी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ओम काथे आणि साहिल देवरे या दोघांना अटक करण्यात आली. दोघांना संगमनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी शैलेश रोकडे याची रवानगी अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे. तर सखोल तपासादरम्यान सुमित शेवंते याचा या कटात सहभाग स्पष्ट झालेला नसल्याने त्याच्यावरील पुढील कारवाई सध्या प्रलंबित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

