विजेची समस्या तात्काळ सोडा ; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू; शहराप्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला इशारा
संगमनेर ( प्रतिनिधी )
विद्युत महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळेच शहर परिसर, उपनगर, गावठाणात सर्रासपणे वीजेचा लपंडाव सुरू आहे. एकीकडे पावसा थेंब टपकतो न टपकतो तोच वीज गायब, तर दुसरीकडे अधिकारी, कर्मचारीही गायब होतात. फोन लावूनही फोन उचलले जात नाही, रिसीव्हर बाजूला काढून ठेवले जातात. दिवसात अनेक वेळा विजेचा खोळंबा आणि रात्रीचा डासांचा प्रादुर्भाव यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिववसेना गटाचे शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराच विद्युत मंडळाला दिला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे. परंतु बिलामध्ये मात्र कोणतीही बदल नसून अवाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तारा पडणे, तारा तुटणे, दिवसरात्री 70 ते 75 टक्के वीज गायबच असते. कुठलेही कारण नसताना वीज गेल्याने व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर रात्री वीज गेल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. 02425- 226925 या क्रमांकावर संपर्क साधला असता तो होऊ शकत नसल्याने नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त करत कानकाटे यांच्याकडे तक्रारीही केल्या.
नागरिकांच्या समस्येला आवाज देण्यासाठी कानकाटे यांनी संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. कानकाटे म्हणतात की, दरवर्षी दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षेची तयारी ही पहिल्या दिवसापासून करावी लागते. आता पावसाळ्याचे चार महिने या वीज लपंडामध्ये विद्यार्थी आणि व्यवसायिकांना तोंड देण्याची वेळ येत असल्याने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालत या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत रवींद्र कानकाटे यांनी गेंड्याच्या कातडी पांगरलेल्या अधिकाऱ्यांना एकप्रकारे जागे होण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर येत्या काही दिवसात ही समस्या न सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराच शहरप्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला. विजेचा झटका काय असतो हे आता आंदोलनातून दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे कानकाटे म्हणाले.