विठ्ठल हाच सुखाचे आगर ; पंढरीचा पाटील विठ्ठलची तो :- ह.भ.प. भारतीताई देवताच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न
पुणे { प्रतिनिधी }
धार्मिक अधिष्ठानासाठी पूर्वजन्मीच संचित लागते. संत, महात्मे धर्म रक्षणासाठी, संवर्धनासाठी जन्म घेतात. धर्माचे रक्षण करण्याचे काम भक्तांनी केले पाहिजे. भगवंताचे स्मरण करा, नाम जपात खरे सामर्थ्य दडले असून संत, महंतच आपल्याला मार्ग दाखवतात. ते उपदेशही करतात. परंतु माणसाचा संसार कधी संपत नाही. माणसे सुख सोडून दुःखाकडे जातात. जिकडे जाऊ नये तिकडे जातात. जिकडे जायचे तिकडे जात नाही, हा मनुष्य स्वभाव. संसार कसा करावा हे पशू पक्षाकडून माणसाने शिकले पाहिजे. पशुपक्षांना निसर्गाचा अभ्यास असतो. निसर्ग तत्त्वाचे ते निरीक्षण करतात, संकेत देतात. मनुष्य प्राण्याने भगवंताच्या चरणी लीन झाले तरच या भवसागरातून आपण तरुन जाल. कारण विठ्ठल हा सुखाचे आगर आहे तो पंढरीचा पाटील आहे. असे मौलिक प्रतिपादन ह.भ.प. भारतीताई चांगुणे- गोमासे यांनी केले.
456, रास्ता पेठ पुणे येथील विश्वकर्मा पांचाळ समाज मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी, भगवान विश्वकर्मा, दत्तात्रेय, श्री गणेश, ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीसह गरूड, कासव आदिंची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याचे पौरोहित्य वेदमूर्ती श्री महेश नंदे गुरुजी न्यासी महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान संस्थापक पुणे, प.पू. श्री गोविंदगिरी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम मंदिर अयोध्या आणि ब्रह्मरुंद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी यज्ञ होम हवन करण्यात आले.
भारतीताई पुढे म्हणाल्या की, खरे सुख पंढरीच्या पुण्यक्षेत्री आहे, विठ्ठला जवळच आहे. माणसाला सुखी व्हायचं असेल तर, देवा तुझा विसर होता कामा नये हेची दान मागितले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
हा धार्मिक सोहळा बघून सुख पावल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आली. कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा पांचाळ समाजाचे विश्वस्त अध्यक्ष सुधीर हामकर, द्वारकानाथ तांबट, विष्णुपंत गोमासे, सुहास जितकर, संजय जितकर, यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा पांचाळ समाज युवा कार्यकारिणीने केले. या कार्यक्रमास युवा कार्यकारणी सह विश्वकर्मा महिला बचत गटाने परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. तत्पूर्वी देवतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिला वर्गाने एकरंगी विशेष अशी वेशभूषा करत तुळशी वृंदावन माथी घेत भक्ती रसात एकरूप झाल्या. हरिनामाच्या गजरात भजन संकीर्तनाच्या ठेक्यावर महिला वर्गानी ठेका धरला सर्व आबालवृध्द या कार्यक्रमांमध्ये हरकून गेली. काल्याच्या कीर्तनानंतर आरती करण्यात आली. महाप्रसाद वाटप करण्यात आला. महाराष्ट्रातून विविध भागातून आलेल्या समाज बांधवांची लक्षनीय उपस्थिती होती.