भारत

“पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे” – इस्रो शास्त्रज्ञ माधवी ठाकरे

Blog Image
एकूण दृश्ये: 12

“पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे” – इस्रो शास्त्रज्ञ माधवी ठाकरे

व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचे सर्वदूर कौतूक

     नाशिक (प्रतिनिधी)

“पत्रकारांची लेखणी म्हणजे रॉकेट आहे. ती सामान्य जनतेच्या समस्या उंच आकाशात नेत सरकारच्या आणि समाजाच्या निदर्शनास आणते,” असे स्फूर्तीदायक उद्गार इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांनी काढले. त्या ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशन समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

अधिवेशनामध्ये शास्त्र, पत्रकारिता आणि स्त्री सशक्तीकरण यांचा संगम पाहायला मिळाला. “प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी ‘मी टाइम’ राखून ठेवणे गरजेचे आहे. कारण "ती" रोजच इतरांसाठी झटत असते. स्वतःच्या छंदांना वेळ दिला पाहिजे,” अशा प्रेरणादायी विचारांनी माधवी ठाकरे यांनी महिला पत्रकारांना सशक्ततेचा मंत्र दिला.

चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “चांद्रयान-३ यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ग्रीसहून आमच्याकडे आले. इस्रोमध्ये त्या वेळी १०० महिला शास्त्रज्ञ उपस्थित होत्या. तो आमच्यासाठी गौरवाचा क्षण होता.” त्यांनी सांगितले की, विज्ञान प्रवासात यश मिळवताना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा प्रभाव, पालकांचे संस्कार आणि स्वतःची जिद्द हेच तीन महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले.

माधवी ठाकरे यांनी सांगितले की, “सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज आहे. समाज कोणत्या दिशेने विचार करतो, हे पत्रकाराच्या मांडणीवर ठरतं. त्यामुळे समाजमन घडवणारी ही लेखणी जबाबदारीने वापरणे अत्यंत गरजेचे आहे.”

----- Advertisements -----

या अधिवेशनात महिला पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा, आरोग्य तपासणी शिबिर, सामूहिक संवाद व्यासपीठ, आणि प्रेरणादायी अनुभवांची देवाणघेवाण यामुळे अधिवेशन भरगच्च आणि प्रेरणादायी ठरले.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी महिला पत्रकारांनी संघटित होण्याची गरज व्यक्त केली. “एकजूट म्हणजेच शक्ती. या एकतेतूनच पत्रकार महिलांचे हितसंबंध जपले जाऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले.

या अधिवेशनात ‘मिशन महाराष्ट्र’ या नावाने महिला पत्रकारांचा स्वतंत्र सेल स्थापन करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात महिलांची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा उद्देश या सेलमागे आहे. याच वेळी *‘व्हॉईस ऑफ मिडिया’*च्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन माधवी ठाकरे यांच्या हस्ते झाले.

रश्मी मारवाडी यांनी अधिवेशनातील १० ठराव वाचून दाखवले, त्यास विना पटणी यांनी अनुमोदन दिले, आणि सर्व महिला पत्रकारांनी त्यास एकमताने संमती दिली. या ठरावांमध्ये महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, व्यावसायिक विकास आणि संघटनात्मक भागीदारीसंबंधी महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता.

अधिवेशनात “संघर्षातून आत्मविश्वास निर्माण होतो,” ही भावना प्रत्येक वक्तृत्वातून आणि उपस्थित महिलांच्या अनुभवांतून प्रकर्षाने जाणवली. विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला पत्रकारांनी एकमेकींशी संवाद साधत संघर्षांची शिदोरी आणि प्रेरणादायी अनुभव शेअर केल्या.

----- Advertisements -----

कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी उपस्थित सर्व महिलांना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ची शपथ देण्यात आली. “पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नव्हे, ती समाज घडवण्याची प्रक्रिया आहे,” असा संदेश या अधिवेशनातून उमटला.

अधिवेशनातील ठळक वैशिष्ट्ये: 

 • इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांचे मार्गदर्शन

‘ मिशन महाराष्ट्र’ महिला पत्रकार सेलची स्थापना

 • महिला पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी व विशेष कार्यशाळा

----- Advertisements -----

 • प्रेरणादायी ठराव संमत

 • ‘व्हॉईस ऑफ मिडियाच्या स्मरणिकेचे प्रकाशन

 • महिलांना सशक्ततेचा आणि सकारात्मक पत्रकारितेचा संदेश

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin